
प्राचीच्या विळख्यातून बचवला, रेडियोवर ‘आर. जे.’ म्हणून निवड झाल्याचं पत्र आलं, स्वप्नांची नगरी चार पाऊले जवळ आली. एकंदर मास मीडियात आलेल्या अपयशानंतर, बेरोजगारीनंतर, फसलेल्या प्रेम(?)प्रकरणानंतर आणि अंधारानंतर आता आयुष्य उजाडू लागलेलं चंद्रहासचं. लहान खेड्यातून शहरात आलेल्या तरुणाचं होतं तेच चंद्रहासचं होण्याआधी आवर्ताने गिळलेल्या मानसचं पत्र आलं, शेवटचं? . . .
दुपारी टपाल घेऊन पोस्टमन आला. एकच लखोटा होता, पण फार महत्त्वाचा. रेडिओ चॅनलकडून चंद्रहासचं सिलेक्शन झालं होतं. ट्रेनी म्हणून काम करून नंतर तिथेच नोकरी करायची होती. चॅनलचे लोक कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घ्यायला आले होते तेव्हा त्याने बिनधास्तपणे मुलाखत आणि आवाजाची चाचणीही दिली होती. खरं तर त्याच्या बॅचच्या अनेक मुलामुलींनी ती दिली होती. खासगी चॅनल असलं, तरी खूप लोकप्रिय होतं. मुलींचे गोड गोड फोन आणि गाण्यांची लाघवी फरमाइश हा तर मस्तच मामला होता.
आर. जे. ला एखाद्या स्टारसारखं महत्त्व येऊ लागतं, त्याची एक प्रतिमा निर्माण होऊ लागते आणि त्याला बघण्यासाठी, भेटण्यासाठी त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडणाऱ्या पोरीबाळी तरसू लागतात हे चंदू जाणून होता. मुंबईच्या प्रचंड महासागरात केवळ गुणवत्तेवर आपण आता पोहू लागणार या जाणिवेने त्याचा आत्मविश्वास दुणावला. धीर देणाऱ्या मानसला ही खबर दिलीच पाहिजे आणि आपल्याला विटाळणाऱ्या त्या प्राचीला अजिबात द्यायला नको असं चंद्याला वाटलं, पण मानूचा फोन बंद होता. नंतर सांगू असा विचार करून चंदूने फोन ठेवून दिला.
रेडिओवाल्यांनी चंद्रहासला बोलावलं. आता तो मुंबईतच राहणार ही खबर वाडीत लगेच पसरली. दोन तीन बडबड्या, चंदूच्या आईच्या शब्दात ‘चोंबड्या’ पोरी हे काम तातडीने करत. “हवं तर कर्ज काढू पण तुझं मुंबईतल्या खोलीचं भाडं भरू. तुझ्या त्या रेडिओ केंद्राच्या आसपास बोरिवलीतच शोध रूम. लोकलची रोजची भानगड नको.” असा उत्साह चंद्रहासच्या घरात दिसू लागला. निघण्याची इतकी घाई, गडबड झाली की, खोली मिळेपर्यंत कौस्तुभ नातूकडे राहायचं त्याने ठरवलं. कौस्तुभ त्याचा गाववाला. त्याने उपनगरातच गोरेगावला फोटो स्टुडिओ थाटला होता. भाड्याची खोली घेतली होती. घरावर पत्रा होता, पण आसरा तर होता! तिथं राहायचं नक्की झालं. कौस्तुभ म्हणाला, “ये रे तू बिनधास्त! मी आहे ना! मुंबईकरच झालोय मी आता. तुझी नाइट ड्युटी असेल तरी हरकत नाय! एक चावी तुझ्याकडे देऊन ठेवेन. डोन्ट वरी.” कोकणी माणूस मुंबईतही आपलं गाव, गाववाले जपतो याचा छान अनुभव आता येऊ लागला होता. जॉब मिळवण्यासाठी कुठलंही वंगाळ काम करण्याची आता गरजच नव्हती, क्वालिटी महत्त्वाची होती. प्राचीला कळल्यावर तिलाही आश्चर्य वाटलं असतं की, चंदूचा सितारा रेडिओवर न दिसताही चमकू लागला.
चंदू अगदी एसटीत बसायच्या वेळी मानसला कुणी तरी चंद्रहास मुंबईला जॉबसाठी निघालाय हे सांगितलं. तो धावतपळत घामाघूम होऊन स्टॅण्डवर आला. चंद्रहास रिक्षेतून उतरत होता. एस. टी. स्टॅण्डवर येऊन उभीच होती. मानसशी धड बोलताही आलं नाही. “फोन करतो नंतर. अचानक पत्र आलं सिलेक्शनचं. आता मुंबई सोडणार नाही मी. काय पण होऊ दे. टिकणार मी मोठ्या स्पर्धेत! मुंबईच्या स्मार्ट पोरी, चॅटिंग करतील आता माझ्याशी.” असं, इतकंच खेळीमेळीत बोलणं झालं आणि बस सुटली. मानसचे डोळे डबडबले होते. चंद्रहास, त्याचा जिवलग मित्र आता रोज भेटणार नव्हता. दिसणारही नव्हता. मानसच्या मनातली मुलगी टिपं गाळत होती. त्या प्रेमाची बिलंदर दुनियेला जरासुद्धा किंमत नव्हती. ‘हा कोण रडतोय बायल्या’ अशी तुसडी तुच्छता मात्र होती. पुरुषाला रडण्याचाही हक्क नव्हता. समलैंगिक हा पुरुष असूनसुद्धा त्याला ‘मर्द’ मानायला जग तयार नव्हतं.
चंद्रहास फार लवकर मुंबईला सरावला. रेडिओवरून शब्दांशी खेळत गेला. मीडियात रुळत गेला. इतर तरुण सहकारीही त्याला गावाकडचा न समजता छान सांभाळून घेत होते. तोही त्यांच्याशी चांगलंच वागत होता. कुठं काही उणं नव्हतं. मुंबईला ‘गुड मॉर्निंग’ करत चंदू आपल्या चटपटीत गप्पा सुरू करायचा. मोसम असेल, त्याला अनुरूप गाणी वाजवायचा. रेडिओचं गारूड त्याला नव्याने उमजत होतं. ट्रेनिंगचा ऋतू असूनही त्याचा बॉस अनुप त्याला भरपूर वाव देत होता. अनुप देशमुख जणू माझा मोठा भाऊच आहे, असं चंदू घरी, गावी कळवायचा. मानसचा मात्र एकदाच फोन आला. तोही ब्रॉडकास्ट सुरू असताना श्रोत्याचा येतो तसा नाही. चंदू घरी असताना रात्री आला. त्याने फक्त गोरेगावचा, चंद्याचा, म्हणजे त्या स्टुडिओवाल्या नातूचा पोस्टल पत्ता मागून घेतला. “कधी येणार असशील गोरेगावला तर कळव,” असंही चंदू म्हणाला.
मानस स्वत: आला नाही. त्याचं पत्र बंद पाकिटातून आलं आणि विजेचा शॉक बसावा तसं चंद्रहासला वाटलं. घरच्या लोकांनी मला हे कळवलं कसं नाही? की, हा सगळी थट्टा करतोय? चंदूने लगेच घरी फोन केला. तो लागेना. मग कांचन सावंतला केला. “तुला कधी कळलं? खरी आहे बातमी. मानस इज नो मोअर! समुद्रात जीव दिला त्याने.”
आत्महत्या करण्यापूर्वी मानसने ते पत्र चंदूच्या मुंबईच्या पत्त्यावर पाठवलं होतं. थरथरत्या हातांनी चंद्रहास पत्र पुन्हा नीट वाचू लागला.
– क्रमशः
{fullwidth}