
बेरोजगारी, वासनांधता, फसवा आदर्शवाद, मित्राच्या मृत्यूचे धक्के, घरच्यांचा रोष सगळे चढउतार कसेबसे नाहीसे होत आलेले चंद्रहास मुंबईचा झाला तेव्हापासून. धकाधकीतलं नावीन्य, कुतूहल आणि उद्याची आशा मावळण्याआधीच मानसचं पत्र आलं. काटा-छापा असणारे हे दोघे मैत्रीच्या नाण्यावर एकत्र! चंदूला शारिरीक सीमा ओलांडणं शक्य नव्हतं आणि मानसला त्या राखणं. पर्यायी दोघांचे काही संघर्ष एकेकट्यापुरतेच मर्यादित राहिले आणि अचानक एक दिवस एकाचा संघर्ष, कायमचा, संपल्याचं पत्र आलं . . .
जिवलग मित्रा,
मी या क्रूर जगाचा निरोप घेतोय. मी कुठंच असणार नाही. कधीही दिसणार नाही. आपण चार्वाक मानतो. आपण चार्वाकाचीच पिल्लं आहोत. भूतप्रेत, पुनर्जन्म असलं काही आपण मानत नाही. पण चंद्रा, मी तुलाच माझ्या स्वप्नांचा राजकुमार मानत आलो. तू मला झिडकारलंस. तुझ्या हद्दीत राहा म्हणालास. तू लग्न करणार, बायको आणणार, संसारात रमणार... पण मग माझं कोण? माझ्यासाठी या समाजाने, या देशाने कोणती स्पेस ठेवलीय? मी कुणासाठी जगायचं? मान्य की आपल्यात कधीही लैंगिक संबंध प्रत्यक्षात नव्हते. जे घडायचं ते फक्त माझ्या स्वप्नात; पण यार, तू निदान रोज दिसत होतास. समोर वावरत होतास. भांडत होतास. सोबत होतास आणि तुझा सहवास होता. आता खूप एकटा पडलो रे मी. तुला मुंबईचा महासागर मिळाला याचा आनंदच आहे रे मला. चांदोबा, तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होऊ देत. पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मुंबईत येऊन तुझ्याबरोबर राहिलो, स्ट्रगल केला तरी तू मला खऱ्या अर्थाने लाभणार नाहीस. तू माझ्या पंथातला नाहीस. पण तुला खरं खरं सांगतो. मी दुसऱ्या कुठल्या पुरुषाचा आता विचारच करू शकत नाही. मी मनातून तुलाच वरलं होतं आणि त्यातलं काही तुला शक्य नव्हतं. सक्ती करण्याचा तर प्रश्नच येत नाही. ही एकतर्फी आसक्ती होती. तळमळत, तडफडत, दुरावा किंवा विरह सोसत, एकतर्फी प्रेम करत झुरण्यापेक्षा मी आपल्या दोघांचा आवडता समुद्र जवळ करतोय. मी पाण्यात नाहीसा झालो तरी माझ्या जिवलगा, तुला किनारा लाभावा! त्या रात्री मी तुझ्याकडे वस्तीला होतो. तेव्हा तुला फक्त धीर हवा होता, मित्रत्वाचं मार्गदर्शन हवं होतं. तुला मी अधोगतीपासून वाचवलं. नाही तर तू प्राचीच्या जाळ्यात कायमचा पुन्हा फसला असतास. त्या रात्री मी फक्त तुझा मित्र होतो आणि आता एकतर्फी प्रेम करणारी तुझी ही प्रेयसीसुद्धा तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जातेय. पण चंदू, माझं प्रेम मुलीइतकंच प्रामाणिक आणि उत्कट होतं... बघ, होतं म्हणून मी स्वत:ला सागरात बुडवून टाकलं. मी भूतकाळ बनलो. माझ्या चंद्रहासला उज्ज्वल भविष्यकाळ मिळो. मला कधी विसरू नकोस.
— तुझाच, मानस.
चंदूला अनेक गोष्टी आता जाणवत राहिल्या. आपण पुन्हा हे पत्र वाचायचा प्रयत्न करतोय पण अक्षर दिसत नाहीय. कारण डोळ्यांतून समुद्रच ओघळू लागलाय. माणसाने माणसाला किती दु:खी करून ठेवलंय! मानसच्या कोमल दु:खाला एक प्रकारे मीच जबाबदार नाही का? माझा तसा काही दोष नाही, पण तो तसा वेगळा होता त्यात त्याचा तरी काय दोष होता? त्याचं ते अथांग प्रेम शारीरिक अंगाने मी स्वीकारलं नाही म्हणून तो निराश होत गेला. ज्याला अशा गोष्टींत रस नाही उपजत आवडच नाही त्याच्यासाठी तडफडत राहणं ही चूकच नाही का? ते काहीही असलं, तरी मानस मला हवा होता.
मानू, तू स्वत:ला का नाहीसं केलंस? मला सावरण्यासाठी, आवरण्यासाठी तू हवा होतास! मी सेटल झालो की तुला मुंबईत बोलावून घेतलं असतं. तुझं ‘मानस’शास्त्र मला नीट कधी कळलंच नाही. बराचसा महासागर अज्ञातच राहतो रे. काय काय असतं समुद्राच्या पोटात! ऑक्टोपसचे छद्मी रंगखेळ असतात. दीर्घ कथेसारखं आयुष्य जगणारी संथ कासवं तिथेच राहतात. मदन सुंदर पण विषारी सर्प मृत्यू बनून येतात. गाणाऱ्या निळ्या देवमाशाची तर शिकारच होते. एकाच पद्धतीची विचार न करणारी, सहज जाळ्यात गावणारी जीवनशैली हजारो माशांच्या झुंडी दाखवत असतात. काही चमकते मोती कायम शिंपल्यांतच बंद राहतात. उथळ पाण्यात उतरलेल्या सज्जनांना दंश करतात. खोल पाण्यात हल्ली फार कुणी उतरत नाही. सगळा वरवरचा फेसबुकचा फेसच दिसतो. मानस, मी तुला विसरणं शक्यच नाही! आपल्या नास्तिक केंद्रालाही मी तुझं नाव देणार आहे. मी केंद्राकडे लक्ष देत नाही, बाईच्या नादी लागतो म्हणून तू नाराज होतास ना? इंटरनेटच्या मदतीने आपलं केंद्र आपण जोरात चालवू! केंद्राचं नाव ‘निरीश्वरवादी मानस केंद्र’.
आक्रोश करणारं, मित्राला हाक मारणारं चंदूचं मन रात्री डायरी लिहीत गेलं. मानसने आत्महत्येचं कारण कुणालाच सांगितलं नव्हतं. फक्त जिवलगाला कळवलं होतं. अनादि वासना अशा वेगळ्या रूपात, निराळ्या समकामी अंगाने उभी राहते, तेव्हासुद्धा माणसाला जगण्याचा अधिकार, सन्मानाने आपला कल जोपासण्याचा हक्क मिळायलाच हवा. पुढारलेले, सुधारलेले देश तो देतही असतात. आपण अशा वेगळ्या माणसांना माणूस म्हणून कधी समजून घेणार हा खरा सवाल आहे.
रेडिओतलं कर्तव्य संपलं की, चंदू मुंबईच्या समुद्रावर जाऊन एकटाच शांतपणे बसतो. समोरच्या समुद्राचं अमर्याद, सर्वदूर पसरलेलं रूप पाहतो. नदी जशी समुद्राला, तसा हा दर्या महासागराला जाऊन मिळतो असं त्याला वाटतं. मानसची आठवण आली की, भरून आलेले डोळे चंदू पुसतो. नाव नसलेला एखादा तारा समुद्रात पडताना दिसतो. अगदी मानूसारखा! अधुरा!
— समाप्त
{fullwidth}